“राज्यातील बळीराजा संकटात कसा जाईल असे निर्णय या सरकारकडून घेतले जात आहे. त्यांना बळीराजाची चिंता नाही.मी अजूनही तरुणच आहे.लवकरच नवा इतिहास घडविणार आहे.” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, जेष्ठ नेते शरद पवार यांनी चऱ्होली खुर्द( ता. खेड )येथील बैलगाडा शर्यतीच्या घाटात शेतकरी,बैलगाडा मालक,शौकीन,उपस्थित हजारोंच्यासमोर केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने मी सेवेकरी सोशल फाउंडेशन व केळगाव, चऱ्होली खुर्द, आळंदी ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठी” साहेब केसरी “बैलगाडा शर्यतीचे आयोजन पाच दिवस करण्यात आले होते. या बैलगाडा शर्यतीच्या घाटात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी पुढे बोलताना पवार म्हणाले की,”शेतमालाला बाजार नाही. कांदा निर्यातबंदी केल्यानंतर शेतक-यांवर संकट ओढवले आहे. बळीराजा संकटात आहे.एकजुटीच्या जोरावर महाराष्ट्राचे चित्र लवकरच बदलणार आहे.
काहीजण मला म्हणतात तुम्ही ८३ वर्षांचे आहात. पण मी अजूनही तरुणच आहे.” या बैलगाडा शर्यतीला पिंपरी चिंचवड परिसर तसेच खेड तालुक्यातील, पुणे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यतीसाठी आले होते. बैलगाडा शर्यतीसाठी मोठ्या प्रमाणात बक्षीसे ठेवण्यात आली होती.बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी हजारो शौकीनांनी गर्दी केली होती.
यावेळी खेड तालुक्यातील तसेच पिंपरी -चिंचवड, पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, तसेच शिवसेना व इतर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष हिरामण सातकर, बबनराव कुऱ्हाडे, सोमनाथ मुंगसे, ऍड.देवेंद्र बुट्टे पाटील,अमोल पवार,मंगलदास बांदल, देवदत्त निकम, अशोक खांडे भराड,लक्ष्मण टोपे,विशाल झरेकर आदी व इतर पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद पवार पहिल्यांदाच बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले की,आजपर्यत टिव्हीवर बैलगाडा शर्यती पाहिल्या, पण घाटात आल्याशिवाय डोळ्याचे पारणे फिटत नाही.बैलगाडा शर्यत हि वेगवान स्पर्धा आहे. बैलगाडा शर्यतीबाबत धोरणात्मक निर्णय घेतले तर जागतिक पातळीवर नावलौकिक मिळेल.असे सांगून बैलगाडा शर्यतीचे कौतुक केले.