मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर सरकार अॅक्शन मोडवर आलं असून राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे यांच्या कुटुंबात एकही कुणबीची नोंद आढळली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
इतकंच नाही, तर जिथून मराठा आरक्षणाची (Maratha Reservatio) लढाई सुरू झाली, त्या अंतरवाली सराटी गावात देखील एकही कुणबीची नोंद न्यायमूर्ती शिंदे समितीला आढळली नसल्याची माहिती आहे. शिंदे समितीने आतापर्यंत ज्या कुणबी नोंदी शोधल्या त्यातून ही माहिती समोर आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
त्यामुळं मनोज जरांगे, त्यांचे कुटुंबीय आणि अंतरवाली सराटीचे गावकरी देखील आरक्षणापासून वंचित राहण्याची चिन्हं आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या ४ महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत.
मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी भूमिका देखील जरांगे यांनी घेतली आहे. मात्र, जिथून मराठा आंदोलनाची सुरुवात झाली त्याच अंतरवाली सराटी गावामध्ये एकही कुणबी नोंद सापडली नाही. त्यामुळे आरक्षण मिळेल की नाही यावर चर्चा सुरू आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात गेल्या ४ महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. तिथे केवळ कुणबींच्या १२७ नोंदी सापडल्या आहेत. त्याआधारे ४०३ जणांना आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे जरांगे पाटील यांनी अनेकदा भाषणात सांगितले की माझीच नोंद सापडली नाही. पण नोंदी नसल्यानं काय करणार असा प्रश्न आहे.