हिंगोली : आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना मोफत आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने शासनाच्या वतीने महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ७१ हजार ४३६ रुग्णांनी लाभ घेतला असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने नोव्हेंबर २०१३ पासून महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना राबवण्यात येते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना आवश्यक ते उपचार मोफत मिळावेत, हा या योजनेचा उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंत मोफत उपचार करण्यात येतात. जिल्ह्यातील तीन शासकीय व सहा खासगी रुग्णालयांत या योजनेंतर्गत उपचार घेण्याची सुविधा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका, आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र आवश्यक आहे. शिधापत्रिका व आधार कार्डावरील नाव सारखे असणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात या योजने अंतर्गत मागील वर्षभरात जवळपास ७१ हजार ४३६ रुग्णांनी मोफत उपचार घेतले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी दिली आहे.