मुंबई– महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी तिन्ही पक्षातील प्रमुख नेते पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते.राज्यभरात महायुतीचे मेळावे घेण्याचे नियोजन आहे. त्यानुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १४ जानेवारीपासून राज्यात मेळावे घेतले जातील, अशी माहिती अजित पवार गटाचे नेते सुनिल तटकरे यांनी दिली. (ncp shiv sena bjp mahayuti alliance press conference mumbai maharashtra for lok sabha election)
तीन पक्ष एकत्रपणे निवडणुकाला सामोरे जाणार आहोत. सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहेत. जानेवारीमध्ये जिल्हा आणि गाव पातळीवर मेळाव्यांचे आयोजन केले जाईल. फेब्रुवारीमध्ये विभागस्तरावर मेळावे होतील. फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात मेळावे होतील, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी दिली.
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्र निवडणूक लढवणार आहेत. त्यादृष्टीने रणशिंग फुंकण्यात आलंय. महायुती लोकसभेच्या ४५ जागा जिंकेल असा दावा नेत्यांकडून करण्यात आला आहे. त्यासाठीच १४ जानेवारीपासून मेळावे सुरु करण्यात येणार आहेत. फेब्रुवारीमध्ये मेळावे संपण्याचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती बावळकुळे यांनी दिली.