Wednesday, October 16, 2024
Homeताज्या-बातम्याविद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ‘जात पडताळणी’चे बंधन! प्रमाणपत्रासाठी 3 महिन्यांचा कालावधी; बारावीतील विद्यार्थ्यांना समितीचे...

विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ‘जात पडताळणी’चे बंधन! प्रमाणपत्रासाठी 3 महिन्यांचा कालावधी; बारावीतील विद्यार्थ्यांना समितीचे ‘हे’ आवाहन

सोलापूर : विज्ञान शाखेसह व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्यांनी प्रवेशापूर्वी जात पडताळणी समितीकडे अर्ज करावा, म्हणजे त्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळेल आणि कोणालाही प्रवेशासाठी अडचण येणार नाही. परीक्षेनंतर सर्वच विद्यार्थी एकाचवेळी अर्ज करतात, काहींच्या अर्जात त्रुटी असतात आणि त्यामुळे प्रमाणपत्राला विलंब होतो, असे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.

ओबीसी, एसबीसी, एनटी-व्हीजेएनटी व एससी, एसटी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसह निवडणूक लढविलेले राजकीय व्यक्ती व नोकरदार जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी समितीकडे अर्ज करू शकतात. अर्जासोबत ‘१५-ए’ हे प्रतिज्ञापत्र (प्राचार्याचे), नमुना नं. ३ व १७ अर्ज देखील द्यावे लागणार आहे. तसेच अर्जासोबत शैक्षणिक व महसुली पुरावे देखील जोडावे लागणार असून त्यावर जात नमूद असायला हवी. अर्जासोबत जोडलेल्यातील एखादा कागद संशयास्पद वाटल्यास पडताळणी समितीकडील दक्षता पथकामार्फत गृहभेट देऊन अर्जदाराची चौकशी केली जाते. त्यानंतर कागदपत्रांची खात्री झाल्यावर संबंधिताला प्रमाणपत्र दिले जाते. प्रमाणपत्र देण्यासाठी समितीकडे तीन महिन्यांचा (९० दिवस) कालावधी असतो, पण अर्जदाराची गरज पाहून त्याला कमीत कमी दिवसात प्रमाणपत्र देखील समिती देते. सध्या सोलापूरच्या जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांसह एक सदस्य धाराशिव समितीचेही काम पाहतात. त्यामुळे अर्जदारांनी तत्काळ अर्ज करावेत म्हणजे वेळेत प्रमाणपत्र देणे शक्य होईल, असेही समितीने स्पष्ट केले आहे.

कोणत्या जातीला किती वर्षांचा पुरावा

  • १) एससी, एसटी : जातीचा उल्लेख असलेले १९५० पूर्वीचा शैक्षणिक किंवा महसूली पुरावे
  • २) व्हीजेएनटी : जातीचा उल्लेख असल्याचा १९६१ पूर्वीचा पुरावा
  • ३) ओबीसी, एसबीसी : या प्रवर्गातील अर्जदाराकडे १९६७ पूर्वीचे पुरावे बंधनकारक
  • ‘या’ व्यक्तींनाच करता येतो अर्ज
  • – विज्ञान शाखेतील किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमाला (मेडिकल, फार्मसी, अभियांत्रिकीसह इतर) प्रवेश घेणारे विद्यार्थी जात पडताळणीसाठी अर्ज करू शकतात.
  • – ग्रामपंचायतीसह इतर निवडणुकीला उमेदवार असलेले व जे विजयी झाले त्यांना निवडून आल्याचा जाहिरनामा जोडून सहा महिन्यांत अर्ज करता येतो.
  • – नोकरदार व्यक्तीला देखील जात पडताळणी प्रमाणपत्राचे बंधन असते, त्यामुळे ते देखील जात पडताळणी समितीकडे अर्ज करू शकतात.
  • ऑनलाइन अर्ज करण्याचे संकेतस्थळ
  • जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी संबंधिताला पहिल्यांदा ऑनलाइन अर्ज करावा लागतो. तो अर्ज सबमिट झाल्यावर त्याची प्रिंट काढून मूळ कागदपत्रांसह जात पडताळणी समिती कार्यालयात देखील अर्ज द्यावा लागतो. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी http://www.bartivalidy.com व http://www.ccvis.com या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा लागतो.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments